विद्यार्थी साहाय्यक समिती

ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारी संस्था आणि युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कामाकडे पाहिले जाते. समिती ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ५० ए (३) अंतर्गत नोंदणीकृत (क्र. ई-२१९, पुणे) संस्था असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्तेच्या जोरावर काहीतरी ध्येय ठेवून धडपड करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुण्यात अतिशय माफक दरात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी या हेतूने ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ फाटक, सुमित्राताई केरकर आदींनी १९५५ मध्ये या कामाला सुरवात केली.

उपक्रम

अल्पदरात निवास व भोजन पुरवणे एवढ्यापुरतेच मर्यादित समितीचे कार्य नाही तर येथील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास हे समितीचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी व्यवस्थापनातून या ग्रामीण युवकांचे सुसंस्कारित आणि आत्मविश्वासपूर्ण पिढीत रुपांतर करण्याचा समितीचा मनोदय आहे.

गटचर्चा, इंग्रजी भाषा वर्ग. इंग्रजी प्रेझेंटेशन, योगासने, क्रीडा (अनिवार्य), सांस्कृतिक कार्यक्रम (पाककला, वादविवाद, वत्कृत्व, कथाकथन आदी स्पर्धांचे आयोजन), विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने, शैक्षणिक सहली, उद्योजकता विकास उपक्रम, विद्यार्थी व्यवस्थापन.

सुविधा

समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर
व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व असते. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर समितीचे काम चालते. एका खोलीत तीन ते चार विद्यार्थ्याची व्यवस्था असते.
प्रत्येकाला स्वतंत्र कॉट, गादी, टेबल, खुर्ची, कपाट मिळते. पंखा, गरम पाणी या सोबतच, संगणक प्रशिक्षण, सुसज्ज ग्रंथालय, आरोग्य केंद्र, खेळासाठी साहित्य आदि सुविधा उपलब्ध केल्या जातात.