विद्यार्थी साहाय्यक समिती, ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तनात घडविणारी संस्था आणि युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कामाकडे पाहिले जाते. समिती ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ५० ए (३) अंतर्गत नोंदणीकृत (क्र. ई-२१९, पुणे) संस्था असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्तेच्या जोरावर काहीतरी ध्येय ठेवून धडपड करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुण्यात अतिशय माफक दरात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी या हेतूने ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ फाटक, सुमित्राताई केरकर आदींनी १९५५ मध्ये या कामाला सुरवात केली. त्यावेळी पाच विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या घरी वाराने जेवणाची सोय करण्यापासून काम सुरू झाले. पुढे विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न मार्गी लावला. मग विद्यार्थिनींसाठी सोय करण्यात आली. आता समितीची पुण्यात चार वसतिगृहे असून त्यात सुमारे ७५० विद्यार्थी, विद्यार्थिनी येथील सुविधांचा लाभ घेत आहेत. समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व असते. माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, जात, धर्म, पंथ या संकल्पनेचा इथे थारा नाही. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर समितीचे काम चालते. देणगीदार जरी शहरी भागातले असले तरी प्रवेश फक्त ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनाच दिला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत