प्रवेश माहिती पत्रक (२०२५-२६)
प्रवेश प्रक्रिया केवळ प्रथम वर्षाच्या (पदविका , अभियांत्रिकी, कोणत्याही पदवीधर) विद्यार्थ्यांसाठी आहे. फक्त प्रथम वर्षाच्या विद्यार्थांनीच प्रवेश फॉर्म भरावा. अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश नाही.
समितीविषयी
ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणा-या गरीब, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात निवासाची व भोजनाची सोय व्हावी व त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, उद्योजकतेचे बाळकडू त्यांना मिळावे हा विद्यार्थी साहाय्यक समितीचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना सुलभतेने शिक्षण घेता यावे, त्यांना योग्य ते सहाय्य व मार्गदर्शन मिळून स्वावलंबनाने समर्थपणे आपल्या पायावर उभे राहता यावे म्हणून काही सेवाभावी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन डॉ. अच्युतराव आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली १९५५ साली या कामाची सुरवात केली. विद्यार्थ्यांसाठी तीन व विद्यार्थिंनींसाठी चार अशी संस्थेची सात वसतिगृहे असून त्यांतून सुमारे ११०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. अहिल्यानगर येथे समितीचे मुलींसाठी कै. म. कृ. ऊर्फ मधुभाऊ चौधरी वसतिगृह सुरू झाले असून तेथे ६० विद्यार्थिनींची सोय आहे. मुलांसाठीचे कल्याणराव जाधव वसतिगृह जून २०२५ मध्ये सुरू होईल. साहाय्यदात्यांकडून मिळणा-या आर्थिक साहाय्यावर व विद्यार्थ्यांकडून येणा-या अल्प शुल्कावर संस्थेचा योगक्षेम सुरू आहे. स्वच्छ्ता, समता आणि श्रमप्रतिष्ठा ही संस्थेची त्रिसूत्री आहे. देशासाठी जबाबदार नागरिक घडवणे यासाठी संस्थेचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. विद्यार्थी व विद्यार्थिनींना दरवर्षी नवीन प्रवेशासाठी जागा उपलब्ध असतात. प्रत्येक सत्रात वसतिगृहातील अवलोकन पाहून प्रवेश दिला जातो. डिप्लोमा, आय. टी. आय., बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी शैक्षणिक गुणवत्ता किमान ६०% असावी लागते.
वसतिगृह नियमावली:
१. खोलीमध्ये टेबल, खुर्ची, कॉट, कपाट, गादी, पडदे व गादीची खोळ या वस्तू असतात. सतरंजी, बेडशीट, ताट या वस्तू प्रत्येकाला सशुल्क देण्यात येतात. प्रवेशानंतर विद्यार्थ्यांनी सोबत बादली, मग, कपड्यांसाठी हँगर, कुलुप इ. वस्तू आणाव्यात.
२. प्रवेशासाठी पालकांची कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व कुटुंबातील अवलंबून असलेल्या व्यक्ती पाहून प्रवेशाचा विचार होतो.
३. वसतिगृहात दिलेल्या सुविधांचा काळजीपूर्वक वापर अपेक्षित आहे, कोणतेही नुकसान झाल्यास त्याची भरपाई संबधित विद्यार्थ्याकडून घेतली जाते.
४. नातेवाईकांना वसतिगृह अथवा खोली पहावयाची असल्यास पर्यवेक्षकांची पूर्व परवानगी आवश्यक असते.
५. कॉलेजला सुट्टी असेल तरच सत्रातून एकदा परवानगी घेऊन गावी जाता येईल. दरमहा किंवा दर शनिवारी-रविवारी गावी जाता येणार नाही.
६. मोबाईलच्या मर्यादित वापरास परवानगी असून रात्री १० नंतर मोबाईल वापरास परवानगी नाही, खोलीतील सहकाऱ्यांना त्रास होऊ शकतो.
७. प्रवेश अर्जातील संमतीपत्रक भरून देणे आवश्यक आहे. प्रवेश झाल्यावर त्यात काही माहिती चुकीची आढळून आल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.
८. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर समितीच्या आरोग्यकेंद्रातून वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे.
९. विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या सर्व वस्तुंची जबाबदारी ही त्यांची स्वत:ची असते.
१०. गैरवर्तणूकीच्या कारणामुळे प्रवेश रद्द झाला किंवा क्लिअरन्स न घेता वसतिगृह सोडल्यास कोणत्याही प्रकारची फी परत मिळत नाही..
उपक्रम :
१. रोज अर्धा तास योगासने, कमवा शिका योजनेत सहभाग व काही कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असते.
२. जनसंपर्क व योग्य शिष्टाचाराचे शिक्षण मिळावे म्हणून विद्यार्थ्यास दरमहा भेटीसाठी एक स्थानिक देणगीदार पालक दिले जातात.
३. परीक्षा संपल्यानंतर दुस-या दिवशी क्लेम / क्लिअरन्स फॉर्म भरुन वसतिगृह सोडावे लागते.
४. विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी रोज अर्धा तास काम करणे अनिवार्य आहे. यामध्ये स्वच्छता, निधी संकलन, भोजनालयातील कामे आदींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे दरमहा अवलोकन करुन त्यांना मार्गदर्शन केले जाते.
भोजनालय :
१. भोजनालयाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. बाहेरील पदार्थ व व्यक्तींना भोजनालयात आणता येणार नाही.
२. विद्यार्थ्यांनी रात्री भोजनालयाच्या वेळेत वसतिगृहात परतणे बंधनकारक आहे. उशीर होत असल्यास पर्यवेक्षकांची परवानगी घ्यावी.
३. भोजनालयात काम करणा-या विद्यार्थ्यांनी नियमित काम करावे व पर्यायी व्यवस्था करुनच रजा घ्यावी. अनिवासी (फक्त भोजन घेणारे) विद्यार्थ्यांना रोज १ तास भोजनालयात काम करावे लागेल. विद्यार्थ्यास प्रवेश देण्याचा अंतिम निर्णय समिती व्यवस्थापनाच्या हाती आहे.
वसतिगृहात पुढील प्रमाणे गैरप्रकार आढळून आल्यास दंड होऊ शकतो किंवा प्रवेश रद्द होऊ शकतो:
१. सुविधांचा गैरवापर उदा. खोलीत कोणीही नसताना पंखा व दिवे लावलेले असणे. इतर इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर करणे उदा. इस्त्री, हीटर, शेगडी इ.
२. वसतिगृहात विनापरवानगी गैरहजर, कागदपत्रांमध्ये गैरप्रकार आढळल्यास, कॉलेजमधील अनुपस्थिती तसेच परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास.
३. विद्यार्थ्यांनी वसतिगृहात परस्पर कोणताही समारंभ / कार्यक्रम अथवा गोंधळ केल्यास.
४. इतर विद्यार्थ्यांबरोबर तसेच कार्यकर्ते व सेवक यांच्याबरोबर भांडण, व्यसन, मानसिक असंतुलन, चोरी, खोटे बोलणे, वसतिगृहातील नुकसान, खोट्या सह्या करणे, योगासन वर्गाला अनुपस्थिती, कमवा-शिका न करणे, स्वयंचलित दुचाकी वापरल्यास.
५. वसतिगृहाच्या नियमांचे पालन न करणे, गैरवर्तणूक, बेशिस्तपणा, वैद्यकीय तपासणी न करणे, व कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास.
६. पर्यवेक्षक/ अध्यक्षांच्या शिफारशीनुसार एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय कार्यकारी विश्वस्त/मुख्य कार्यकारी अधिकारी घेतील.
७. बाहेरून कोणती आर्थिक मदत मिळत असेल व त्याची माहिती पर्यवेक्षकांना न दिल्यास.
प्रवेश :
विद्यार्थ्यांनी नियमावली वाचल्यावर रु. २०० फॉर्म फी ऑनलाइन भरावी. त्यानंतर सोबतची लिंक ओपन करून प्रवेश अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह सबमिट करावा. समितीतून मोबाइलवर मुलाखतीसाठी मेसेज येईल. त्यानंतर विद्यार्थ्याची व त्यांच्या पालकांची मुलाखत घेतली जाईल. यावेळी आर्थिक स्थिती बरोबर गुणवत्तेचाही विचार होतो. प्रवेश निश्चित झाल्यानंतरच शुल्क भरण्यास अनुमती दिली जाते. मूळ कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी जवळ ठेवावी. कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा तहसीलदार / संबंधित अधिका-याचा दाखला किंवा पालक नोकरदार असल्यास सर्व भत्ते दर्शविणारे चालू पगारपत्रक, शेती असल्यास ७/१२ व ८/अ चा उतारा. अवर्षण, अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना त्यांना गरज भासल्यास भोजन व निवास शुल्क सवलतीसाठी गावाची पैसेवारी / पीक नुकसानीचे शेकडा प्रमाण गावचे तलाठी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत असावे.
प्रवेश फी पत्रक २०२५-२६ पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये काही बदल झाल्यास सुधारित दराने फी भरावी लागेल.
तपशील | निवासी विद्यार्थ्यांसाठी | ||
वसतिगृह फी | प्रथमसत्र | द्वितिय सत्र | वार्षिक फी |
रु. १७,००० | रु. १७,००० | रु. ३४,००० |
विद्यार्थिनींसाठी: डॉ. अ. शं. आपटे वसतिगृह, ११८२/१/४, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ फोन: (०२०) २५५३३६३१
विद्यार्थ्यांसाठी: लजपतराय विद्यार्थी भवन, १०३ अ, शिवाजी हौसिंग. सोसायटी मागे, सेनापती बापट रस्ता, पुणे ४११०१६.
फोन:(०२०) २५६३९३३०प्र्थम वर्षाच्या विद्यार्थ्यांनींच प्रवेश फॉर्म भरावा